श्रीराम गुंदेकर

श्रीराम रावसाहेब गुंदेकर : (१२ ऑक्टों.१९५५  - १२ जाने.२०१८)           
       ग्रामीण साहित्यिक, समीक्षक, सत्यशोधकी साहित्याचे अभ्यासक, संशोधक, भाष्यकार. बीड जवळील आंबेसावळी येथे एका शेतकरी कुटुंबात जन्म. महात्मा फुले यांच्या विचारांच्या साहित्यप्रभावातून वाड्.मयीन व्यक्तिमत्त्व घडत गेले.
            उचल(१९९०) हा पहिला कथासंग्रह. कथासंग्रहात अठरा कथांचा समावेश असून यात शिक्षण, राजकारण, दुष्काळ, सहकारी साखर कारखाना यांच्यात पिचलेला गावगाडा यांचे संघर्षमय जगणे त्यातून येते. उचल या कथेचा फ्रेंच, हिंदी आणि तेलगू भाषेत अनुवाद झाला. तसेच आम्ही आमचे वाली या कथेचे नाट्यरुपांतर झाले आहे. ते नाटककार व्यंकटेश काकनाटे यांनी केले आहे.
         लगाम (१९९९) या कथासंग्रहात वीस कथांचा समावेश आहे. वेगवेगळे विषय घेऊन या कथा येतात. यात कार्यकर्त्याचे चित्रण येते. कार्यकर्ते विशिष्ट विचाराने भारावलेले असतात त्यामुळे खोटे, दांभिक, स्वार्थी आणि कार्य कार्यकर्त्याचे सोंग घेतलेली माणसे उघडी पडतात. किंबहुना त्यांचा खोटेपणा उघड करणे हा श्रीराम गुंदेकरांच्या कथामधला एक महत्त्वाचा अनुभव असतो. अर्थात कार्यकर्त्याच्या जगाबरोबर सामान्य माणसांचे एक प्रामाणिक जगही त्यांना आकर्षित करते. म्हणूनच सामान्य माणसांची सुख दु:खे त्यांनी फार समरसून रेखाटलेली आहेत. गुंदेकरांच्या कथेतून मराठी कथेला न गवसलेले अनेक विषय येतात. शोषण करणारा वर्ग आणि शोषित वर्ग यांच्यातील अंत:संघर्ष कमालीच्या सामर्थ्याने आणि टोकदारपणे त्यांची कथा टिपते.
            ग्रामीण साहित्य : प्रेरणा आणि प्रयोजन (१९९९) याग्रंथात ग्रामीण साहित्याची प्रेरणा व प्रयोजन या विषयी भाष्य करून ग्रामीण साहित्याची चळवळ, तिचा विकास व भूमिका मांडली आहे.
            महात्मा जोतिबा फुले : विचार आणि वाड्.मय - भाग : आणि २ (१९९२), सत्यशोधकी साहित्य : परंपरा आणि स्वरूप (२००३) हा चरित्रग्रंथ, महाराष्ट्राचे शिल्पकार सम्यक क्रांतीचे प्रणेते सत्यशोधक म. जोतिबा फुले (२००४) , महात्मा फुले यांची अखंडरचना : म. फुले स्मृतिव्याख्यानमाला (२००५), म.जोतिबा फुले : साहित्य आणि साहित्यमूल्ये (२००२) या संशोधित ग्रंथातून म. फुले यांच्या विचारातून भारतीय समाजाची पूर्नमांडणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहिल्या प्रकरणात म.फुले यांच्या नाटकाचे विवेचन केल्या नंतर पुढच्या तीन प्रकरणातून गुंदेकरांनी म.फुले यांच्या विविध प्रकारच्या काव्यलेखनाचे स्वरूप स्पष्ट केले आहे. म. फुले यांनी लिहिलेला छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पवाडा' हा अनेक दृष्टीने स्वतंत्रपणे अभ्यास करण्याएवढा महत्त्वाचा अभ्यास विषय आहे. छत्रपती शिवाजी महाराजांकडे गोब्राह्मण प्रतिपालक अशा संकुचित दृष्टिकोनातून पाहण्याऐवजी सर्व समाजाचे हित करणारा कल्याणकारी राजा, या दृष्टीने त्यांनी त्यांच्याकडे पाहिले आहे आणि त्यांची ही दृष्टी ऐतिहासिक वास्तव स्पष्ट करणारी आहे. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांकडे सरदाराचा व सरंजामदाराचा पुत्र म्हणुन पाहण्याऐवजी कुळवाडीभूषण म्हणून पाहिले. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वसामान्य लोकांना जवळ करून त्यांच्या जिवाला जीव लावून राज्य उभे केले. हे पाहता म. फुले यांनी लावलेला शिवाजी महाराजांच्या जीवनाचा हा अन्वयार्थ अगदी योग्य आहे हे गुंदेकरांच्या लेखनावरून स्पष्ट होते. रा.ना. चव्हाण यांचे विचारविश्व (२०१४) यालेखसंग्रहात सत्यशोधक रा.ना. चव्हाण यांच्या  कार्याच वेध घेतलेला आहे.   
            सत्यशोधकी साहित्याचा इतिहास : खंड (प्रारंभ ते १९२०) (२०१०) यात सत्यशोधकी साहित्याने वर्णजाती स्त्रीदास्य व्यवस्थेला नकार दिला. साहित्याने जनद्रोही जीवन मूल्यांना आणि साहित्य मूल्यांनाही नकार दिला. सत्यशोधकांनी जनसामान्यांना आपल्या साहित्याचा नायक बनवले. म्हणून सर्वार्थाने हा साहित्य प्रवाह क्रांतीकारक आहे. वेदना, विद्रोह आणि नकार या प्रेरणा या प्रवाहात आहेत. यासर्वांची मांडणी या खंडात केलेली आहे. सत्यशोधकी साहित्याच्या प्रारंभ काळाचेमूल्यात्मक नोंद तपशीलासह, संदर्भासह याखंडातून येते.
            सत्यशोधकी साहित्याचा इतिहास : खंड २ (इ.स.१९२१ -१९५०) (२०१३) याग्रंथात सहासष्ट लेखकांच्या सत्यशोधकीय लेखनाचा विचार केला आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक जडणघडणीत या सर्व सत्यशोधकी लेखकांचा, नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा सिंहाचा वाटा आहे. याची मांडणी याग्रंथातून केलेली आहे.
             ‘सत्यशोधकी साहित्याचा इतिहास : खंड ३ व ४ प्रकाशनाधिन आहेत. ढगाची तहान (१९९९) हा बालकविता संग्रह. श्रेष्ठ कोण माणूस की मांजर’ (१९९९)  हा प्रौढसाहित्य ग्रंथ. गुंदेकरांनी कांही ग्रंथांचे संपादनही केलेले आहे. यात बळीबा पाटील : कृष्णराव भालेकर यांची कादंबरी (१९९८), ढढ्ढाशात्त्री परान्ने : मुकुंदराज पाटील यांची कादंबरी (२००१), देशभक्त लीलासार : मुकुंदराव पाटील यांचे खंडकाव्य (२००३), सत्यशोधकी निबंध (२००१इत्यादी ग्रंथ.   डॉ. श्रीराम गुंदेकर हे पहिल्या पिढीतील ग्रामीण कथाकारसमीक्षक म्हणुन ओळखले जातात. त्यांनी सत्यशोधकी साहित्याच्या इतिहास लेखनाचा बृहत् लेखनप्रकल्प सुरू केला आणि तो पूर्णत्वास नेला. 
                 गुंदेकरांना भि. ग. रोहमाने पुरस्कार (१९९०), मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबाद यांचा नरहर कुरूंदकर पुरस्कार (१९९२), सुशील प्रधान बालसाहित्य पुरस्कार (१९९९), महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार (१९९९ - २०००), सुदाम सावरकर जनसारस्वत साहित्य पुरस्कार (२००२), सेवाभूमी साहित्य पुरस्कार (२००३), इत्यादी विविध पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. अध्यक्ष, ६ वे सत्यशोधकीय साहित्य संमेलन, सातारा, तसेच अखिल भारतीय सत्यशोधकी साहित्य संशोधन परिषदेचे काही काळ अध्यक्ष.

                                                                                                   

Comments

Popular Posts